\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण
महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. अत्यंत यशस्वी आणि फलदायी अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी मूलतः राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आणि कालांतराने 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. कालांतराने योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले व काही काळाने त्यात थोडासा बदल करून सदरील योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर अशाच प्रकारे आरोग्य योजना लागू करण्यासाठी अभ्यास सुरू केला असताना विविध राज्यातील विविध योजनांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला व त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण अभ्यासांती केंद्र शासनाने 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली त्याचवेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रीकरण करून महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने लागू करण्यात आल्या. मूलतः लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा आधार हा शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड ठेवण्यात आला व यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा या चार प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आले याचबरोबर या सर्व शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड देण्यात आले परंतु कालांतराने योजनेचे नाव बदलले व त्यानंतर शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हाच आधार मानला जाऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला साडेतीनशे रुग्णालयांची मर्यादा ठेवण्यात आली परंतु कालांतराने ही मर्यादा वाढत 500 वर नेण्यात आली व त्यानंतर सद्यस्थितीत ही मर्यादा 1000 वर नेण्यात आली आहे. मूळ योजना ही पूर्णपणे इन्शुरन्स मोडवर आधारित होती योजनेच्या सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत ही योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी या शासनाच्या एका इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली व तदनंतर 2020 पासून पुढे ही योजना शासनाच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात योजना राबविण्याकरता या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुरुवातीला तीन टीपीए अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली. या तीन कंपन्या म्हणजे एमडी इंडिया टीपीए, मेडियासिस्ट टीपीए आणि पॅरामाउंट टीपीए. कालांतराने 2020 नंतर हेल्थ इंडिया ही टीपीएस सुद्धा योजनेची जोडल्या गेली अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्राला राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीमार्फत या चारही टीपीए सेवा पुरवत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सलग्निकरण करण्यात आले त्यावेळेस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा अतिरिक्त लाभ हा अशुरन्स मोडवर देण्याचे शासनाने ठरविले व यासोबतच पुढील काळात कोरोना महामारी मुळे योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले व ही योजना महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी मुक्त करण्यात आली त्यावेळी हा अतिरिक्त भार शासनाने स्वतः उचलून अशुरन्स मोडवर अतिरिक्त लाभ देण्यात आला. वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू झालेल्या या योजनेची कालांतराने व्याप्ती वाढत गेली व शासनाने कामगार रुग्णालयाच्या परिसरातच सदरील योजनेकरिता स्वतंत्र इमारत उभारली जिचे नाव \”जीवनदायी भवन\” ठेवण्यात आले जे आज खरोखर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. योजना खरोखर यशस्वी ठरण्यामागे शासनासोबतच योजना प्रमुखांचा तसेच जीवनदायी कार्यालयामध्ये कार्यरत व प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ग्रामीण भागात रुग्णांना लाभ मिळवून देणाऱ्या आरोग्य मित्रांचा तसेच प्रत्यक्षात शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचाही या यशामध्ये विशेष वाटा आहे. अशा या शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व गरजूंनी घेणे आवश्यकच आहे याकरिता शासनाने 155 388 हा टोल फ्री क्रमांक लाभार्थ्यांसाठी देऊ केला आहे. या क्रमांकावर योजनेमध्ये प्राप्त होत असलेले विविध उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालये यासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होते. https://www.jeevandayee.gov.in https://www.pmjay.gov.in
\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण Read More »
